प्रकरण ४ थे पेशव्यांचा तनखा बंद

                                   प्रजातंत्राचा प्रणेता.        प्रकरण ४ थे        पेशव्यांचा तनखा बंद

  आळेकर महाराज श्रोतृवृंदाला म्हणाले, म्हणा, पांडुरंग हरी, वासुदेव हरी.  दोनतीनदा तेच  आळवलं आणि मग नामस्मरण, विठ्ठल, विठ्ठल,विठ्ठल /श्रोते शांत झाल्यावर त्यांनी नामस्मरण थांबवत म्हटलं,

    ‘‘ होऽ!’’ आळेकर महाराजांनी आपला मोर्चा पेशव्यांच्या महालाकडे वळवला. तिकडे महालात जेन आली आहे. तिचा नवरा टॉड आला आहे. पेशव्यांच्या वाड्यात त्यांचा पाहुणचार होत आहे.

  टॉड सकाळीच उठून बैठकीत आला. जरा वेळानं सेवक येऊन काही वृत्तपत्रं ठेवून गेला. टॉडनं एक वृत्तपत्र उचललं. सेवक म्हणला, ‘ स्वामीमहाराजांसाठी आहेत.’’ टॉडनं वृत्तपत्र खाली ठेवलं, तो दूरूनच एका वर्तमानपत्रावर नजर फिरवू लागला.

        जरा वेळानं नानासाहेब  तिथे आले. टॉडनं उभं राहून त्यांना अभिवादन करीत म्हटलं,

‘ गुड मॉर्निंग सर. ’’

‘ शुभ प्रभात. ’’ नानासाहेबांनी टॉडला विचारलं, ‘ काही  विशेष बातमी ? ’’

        टॉड दचकला. ‘  नो, नो, आय वॉज जस्ट...’’

    ‘ अहो, वाचा ना. वृत्तपत्र वाचण्यासाठीच आहेत. टॉडसाहेब, वाचा आणि वाचाल ते आम्हालाही सांगा’’,  नाना हसून बोलले.

        ‘ येस. पण नानासाहेब मला फक्त टॉड म्हणा.मी एक साधा माणूस आहे. ’’

         ‘ बरं, बरं. आज काही विशेष बातमी? ’’  नानासाहेबांनी विचारलं.

        ‘ अं- ’’ टॉड वाचू लागला. ‘ न्यू पर्सनस् इन इंडिया. न्यू गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. सर डलहौसी.’’

            ‘ सर डलहौसी. हिंदूस्थानचा नवा गव्हर्नर जनरल, असंच ना? ’’

        ‘ येस. बट  यू नो? ही इज एक्सपर्ट इन पॉलिटिक्स. मीन्स--- ’’

   ‘ हूंऽ. राजनीती चांगली जाणतो. त्यात तरबेज आहे. ’’नानासाहेब बोलत होते.‘ टॉड, ह्या नवीन गव्हर्नर जनरलला तू ओळखतोस? ’’

टॉडनं नकारार्थी मान हलवली. ‘ ओह, नो. नानासाहेब, आय अ‍ॅम ए स्मॉल पर्सन. ’’

    नानासाहेब काहीसे स्वत:शीच म्हणाले, ‘कोणीही येवो. पिताश्रींनी सर्व इंग्रजांशी इतके चांगले संबंध ठेवले होते.’’

        ‘ येस. गूड. ’’ टॉडनं हसून मान हलवली.

    याचवेळी तात्या आत महालात आले. नेहमीप्रमाणे एका एका तसबिरीपुढे उभे राहून, प्रणाम करत होते.

‘ टॉड, आम्हीसुद्धा पिताश्रींचीच परंपरा चालू ठेवली आहे. सर्व इंग्रजांशी आमचे चांगले संबंध आहेत. टॉड वाचा. काय बातमी आहे आज? ’’

       टॉड मनातच वाचतो. पण कसं सांगावं ते त्याला कळत नाही. त्याला स्तब्ध पाहून नानासाहेब हसून  म्हणाले, ‘ वाचा. काय असेल ते सांगा. ’’

टॉड चाचरत उद्गारला, ‘ न्यू रेग्युलेशन इन इंडिया. यहां पे राजाला लडका न होगा तो - - अ‍ॅडोप्टेड सन, मुलगा, किंग नही होगा. राजा नाही. ’’

तात्या वळून, आश्‍चर्याने जवळजवळ ओरडलेच. ‘ काय? दत्तक पुत्राला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही? तुम्ही भानावर आहात का? काय वाचता ते कळतंय का तुम्हाला? ’’

        ‘  तात्या, शांत व्हा. आपल्याला काही फरक पडत नाही.’’ नानासाहेब तात्यांची समजूत घालत होते. पण तात्यांना ते अजिबात मान्य नव्हतं.

‘ स्वामी, याचा काय परिणाम होणार, ते लक्षात  घ्या. या आपल्या देशात ज्याज्या राज्यात दत्तकपुत्र वारसदार असतील, ती सगळी संस्थानं आपोआप इंग्रजांच्या घशात जातील. त्याचं काय? ’’

नानासाहेबांनी निश्‍वास टाकला. ‘ हूंऽ ऽ.खरं आहे. ’’

तात्या चिडून बोलले,‘ हा सरळ सरळ अन्याय आहे. आमच्या देशात येऊन कायदे करणारे, आमच्यावर अधिकार गाजवणारे हे कोण सोकाजीराव?  ’’

    ‘  तात्या, शांत व्हा. ’’  नानासाहेब शांत स्वरात म्हणाले.

        पण तात्यांचा स्वर चढाच होता, ‘पण स्वामी- - ’’

तात्या आणखी काही बोलणार होते, पण तेवढ्यात रावसाहेब हातात काही घेऊन प्रवेशले.

‘ नानासाहेब, कंपनी बहादूरकडून पत्र घेऊन कोणी आलं होतं. हे पत्र.’’

नानासाहेब म्हणाले,‘ तात्यांना द्या. अमात्य आहेत ते. वाचा तात्या. ’’ रावसाहेबांनी पत्र तात्यांच्या हातात दिलं.

तात्यांनी लखोटा फोडला. पत्र वाचता वाचता त्यांची मुद्रा गंभीर झाली.

       इकडे रावसाहेब आनंदात होते, आपला अंदाज व्यक्त करीत होते. ‘बहुतेक काकासाहेबांच्या पेशवेपदाचा हुकूमनामा असेल. होय ना तात्या?’’ तात्या गंभीर मुद्रेने स्तब्ध उभे.‘ तात्या, नानासाहेब पेशवे होणार याचा तुम्हाला आनंद झालेला नाही दिसत.’’ रावसाहेब तात्यांना चेष्टेने म्हणाले आणि हसत नानासाहेबांकडे पाहत राहिले. तात्या मात्र  गंभीरच होते.

        ‘ तात्या, काय आहे? वाचा. ’’

तात्यांनी एकवार स्वामींकडे पाहिलं. त्यांचा स्वर अधिकच गंभीर झाला. ‘हे पत्र.स्वामी.. . ’’ तात्यांचा स्वर थरथरत होता.

        त्यांना धीर देत  नानासाहेब म्हणाले, ‘ तात्या, जे काही असेल ते वाचा. ’’

       तात्या वाचू लागले,कंपनी सरकारने लिहिले आहे,

‘ श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून वाईट वाटले. त्यांच्या अखत्यारीत ब्रह्मावर्ताचा खूप मोठा प्रदेश आहे. त्यांना वर्षाला आठ लाख रूपये तनखा दिला जात होता. पण- - हे द्रव्य त्यांना व्यक्तिगतरूपात दिलं जात होतं. पण- पण-त्यांच्या वंशजांना यापुढे हे द्रव्य मिळणार नाही. ’’

नानासाहेब आश्‍चर्याने जवळजवळ ओरडलेच,  ‘ काय? ’’

रावसाहेबांनी म्हटले, ‘  तात्या, नीट वाचता आहात ना?  ’’

नानासाहेबांनी खात्री करून घेण्यासाठी टॉडला फर्मावलं,

‘ टॉड तुम्ही पहा बरं.’’

टॉड स्तब्धपणे  उभाच. तात्यांनी  पत्र त्याच्या हातात दिलं आणि मान फिरवून ते उभे राहिले.

   टॉड वाचू लागला.‘ एटीन थर्टीटूचा रेग्युलेशन कॅन्सलड् - - रद्द झाला आहे. आता राजाच्या, वतनदाराच्या ऑर द सेम त्यांच्या वारसाला तनखा  मिळणार  नाही. ’’

रावसाहेब,एकदम उडालेच. ‘ काय? अठराशे बत्तीसचा रेग्युलेशन रद्द? वारसाला तनखा नाही? पण का? ’’

    ‘ राज्यविस्ताराच्या लालसेनं गोरे लोक क्रूर झाले आहेत. ’’ तात्यांचा स्वर थरथरत होता. त्यांना बोलवत नव्हतं.

नानासाहेब दु;खी स्वरात उद्गारले, ’’हे गणराया! हा कुठला न्याय? महालात राहणारे पेशवे रस्त्यावर येतील? ’’

        ’’ झोपडी बांधण्यापुरती जागा तरी देतील का हे आम्हाला? ’’  रावसाहेब पुटपुटले.

‘आपलीच जमीन पण आज आपल्यालाच त्यांच्या विनवण्या कराव्या लागताहेत. जागा द्या, जगू द्या, असं म्हणावं लागतंय. आपल्याच देशात आपण जगायचं कसं?  जायचं कुठे ? असे प्रश्‍न पडले आहेत. गोरा फार क्रूर आहे.  ’’  

   ‘ ओह गॉड ! हे कसलं पॉलिटिक्स? ’’ टॉडलाही दु:ख झालं. ‘ नो, नो. आमचा ईश्‍वर त्यांना कधीच माफ करणार नाही. नानासाहेब, हा टॉड यासाठी लढेल. जेन.. जेन.. ’’ टॉड जेनला ही बातमी सांगायला आत गेला.

नानांच्या मुद्रा गंभीर होती, तितकाच त्यांचा स्वरही गंभीर झाला. ‘तात्या, इंग्रज अधिकार्‍यांना आम्हीसुद्धा आदरानं वागवत होतो. ते सगळं ते विसरले?  ’’

तात्या म्हणाले, ‘ स्वामी जरा स्पष्ट बोलतो, परदेशातून आलेल्या त्या पाहुण्याला काय हवं होतं, ते आपण ओळखू शकला नाहीत. या देशाची सत्ता हातात घेण्याची इच्छा मनात बाळगणारे ते गोरे पाहुणे तुमच्या आदर सत्काराला भुलणार आहेत का?  ’’

रावसाहेब चिडून म्हणाले, ‘वा रे वा नानासाहेबांनी त्यांची इतकी मेहमाननवाजी केली, ती सर्व फुकटच का? ’’

      नानासाहेबांना दु;ख आवरत नव्हतं, ’ देवा ! काय झालं हे? माणूस इतका बदलू शकतो? केलेलं सगळं विसरू शकतो? आमच्या पिताश्रींनी पुण्याची सगळी रियासत त्यांच्या हाती दिली  आणि तरीही- -गणराया ! हे कसलं संकट उभं केलंस?  ’

       ‘ स्वामी, याचा बदला घेतलाच पाहिजे. प्रतिशोध ..फक्त प्रतिशोध.. ’’  तात्या आवेशानं म्हणाले,

    ‘ अर्थात्! ’’ नानासाहेबांच्या स्वाभिमानाला तडा गेला होता. ‘ तात्या, हा आमचा अपमान आहे. आमच्या पिताश्रींचा, बाजीराव पेशव्यांचा अपमान आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. आम्ही गोर्‍यांना याचा जाब विचारणार. आमच्या ह्या विख्यात राजवंशाशी तुमचे हे कद्रू  वर्तन अगदी अयोग्य आहे. आमचे विस्तृत राज्य आणि राज्यासन ही जेव्हा तुम्हास श्रीमंत बाजीराव पेशव्यांकडून मिळाली तेव्हा ती अशा करारावर की, तुम्ही त्यांची किंमत म्हणून आठ लक्ष रूपये दरसाल द्यावेत. जर हे पेन्शन सदोदित टिकणारे नाही, तर त्यासाठी दिलेले राज्य सदोदित तुमच्याकडे कसे राहील?या करारातील पहिली शर्त तेवढी मोडली जावी आणि दुसरी कायम रहावी हे असंबध्द नाही का? ’’

   ‘ अगदी बरोबर. ’’ रावसाहेबांनी दुजोरा दिला. ‘ काकासाहेब, आता स्वस्थ बसून चालणार नाही. तात्या म्हणाले त्याप्रमाणे बदला घेतलाच पाहिजे. आपण आपल्या तलवारी हातात घ्यायलाच हव्यात.’’ आवेशानं पुढे पाऊल टाकीत त्यांनी तलवार उपसली. ‘ हर हर महादेव ! हर हर महादेव ! ’’


   रावसाहेबांना थोपवत नानासाहेब म्हणाले, ‘ थांबा रावसाहेब, आम्ही त्यांना खलिता पाठवून ह्याचा जाब विचारणार आहेात. श्रीमंत बाजीराव साहेबांनी, आमच्या पिताश्रींनी, आपल्या पेन्शनमध्ये काटकसरीने राहून काही शिल्लक मागे टाकली होती म्हणून इंग्रजांच्या अडचणीच्या वेळी पिताश्री त्यांना मदत करू शकले. नव्हे वेळोवेळी मदत केली. आणि आता? पेन्शन चालू ठेवण्याचे काही कारण नाही, असं जर कंपनीचं म्हणणं असेल, तर ह्या कोटिक्रमास इतिहासात तोड नाही. तहाची शर्त म्हणून दिल्या गेलेल्या पेन्शनमध्ये पिताश्रींनी त्याचा विनियोग कसा करावा याचा ठराव केलेला होता की काय? एका विख्यात राजवंशाच्या अधिपतीला हे सांगण्यात येत आहे? पिताश्रींनी कंपनीच्या अडचणीच्या प्रसंगीं त्यांना आर्थिक मदत केली हे ते विसरले का? तात्या सेवकाला पाठवून आपले वकील अझिमुल्लाखान याला बोलावून घ्या. आम्ही खलिता घेऊन त्यांना विलायतेस पाठवू . ते इंग्रजी जाणतात. ते आपली बाजू कंपनी सरकारला समजावून सांगतील. ’’

रावसाहेबांनीही मान डोलावली. नानासाहेबांनी तात्यांकडे पाहिले.

            तात्या म्हणाले, ‘ठीक आहे स्वामी. ’’  पण मनातून मात्र ते अस्वस्थ होते.

                        + + + + + +    


Comments

Popular posts from this blog

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका