प्रकरण ३ रे तात्यांकडे कन्यारत्न

          प्रजातंत्राचा प्रणेता                    प्रकरण ३ रे                                          तात्यांकडे कन्यारत्न

  काही क्षणांनंतर एक सेवक आला. ‘ स्वामींचा विजय असो.’’  मुजरा करीत त्याने सांगितलं, ‘बाहेर एक इसम निरोप देऊन गेला. अमात्यांच्या घरी कन्या रत्न जन्मास आले.

         रावसाहेब आनंदाने उद्गारले,  ‘अरे वा वा वा! तात्यांकडे खूश खबर आहे. वहिनसाहेबांनी एका कन्यारत्नाला जन्म दिला आहे.  ’’

नानासाहेबांनीही आनंद व्यक्त करीत म्हटलं, ‘ अरे वा! तांब्यांची मनू लग्न होऊन सासरी निघाली आणि तात्यांच्या घरात नवीन मनू आली. ’’

    ‘मनकर्णिका ! मनकर्णिका आली.’’  तात्या स्वत:शीच उद्गारले आणि नानासाहेबांची अनुज्ञा घेत म्हणाले, स्वामी मला आज्ञा द्यावी.’’ तात्यांनी नानासाहेबांना लवून नमस्कार करत जाण्याची परवानगी मागितली.

  नानासाहेबांनी थट्टेने स्मित करीत विचारलं, ‘  तात्या, कन्येला पहायला उतावीळ झालात? ’’

        काय उत्तर द्यावं तात्यांना कळेना, ते जागच्या जागीच चुळबुळत उभे होते.  

       नानासाहेबांच्या ओठावर हसू तरळतच होतं. तात्यांकडे पहात ते म्हणाले, ‘ साहजिकच आहे. या. ’’

पेशव्यांच्या दालनात अचानक आनंदाची  कारंजी नाचू लागली. आधीचं गंभीर  वातावरण वितळून गेलं.

‘ तात्या, चलो. ’’  मनू म्हणाली.

    ‘ कुठे? ’’  तात्यांनी गोंधळून विचारलं.

  मनू म्हणाली, ‘ तुमच्या घरी. नव्या मनूला पहायला. चला लवकर. तात्या एकदम थांबले .  मनू खळखळून हसली आणि नानासाहेबांकडे पहात म्हणाली, ‘ नाना, मी महालात जाऊन सरस्वती वहिनींना भेटते, मग तात्यांच्या घरी जाईन. ’’’

नानासाहेब हसत मनूला म्हणाले, ‘ मनू ! अग! उद्या राणी होणार तू, पण अजून तुझा खट्याळपणा गेला नाही. ’’

    ‘  ते उद्या. आज आत्ता नाही. आत्ता मी मनूच आहे. तुमची सर्वांची मैत्रीण. ’’मनू तात्यांकडे पहात बोलली आणि नानासाहेबांकडे पहात तिनं स्मित केलं.

तात्या भराभर घराकडे चालू लागले.

      +++++

       - तिकडे देवळात कीर्तनकार आळेकरबुवा महाराज तात्यांच्या घरी आलेल्या छोट्या पाहुणीचं स्वागत करण्यात रमले होते. तात्यांच्या घरी कन्या रत्न आलं होतं. त्यांच्या घरात आनंद ओसंडून वहात होता. महाराज गाऊ लागले,

           ‘‘आनंदी आनंद  गडे / जिकडे तिकडे चोहीकडे ’’

        होऽ! श्रोतेहो, मनूला निरोप देऊन, तात्या लगबगीनं त्यांच्या वाड्याकडे गेले. बाहेरचा दरवाजा ओलांडून अंगणात आले. पडवीत बसलेल्या त्यांच्या आईने तात्यांची उत्सुकता जाणली, त्या हसत म्हणाल्या,

            ‘ तात्या ! हातपाय धुवा आणि मग बाळाला पहायला जा.’’ तात्यांनी चमकून आईकडे पाहिलं. आईच्या चेहर्‍यावरचं हास्य पाहून तात्यांना जरा संकोचल्यासारखं झालं. ते तडक विहिरीकडे वळले. पाणी शेंदलं, पायांवर घेतलं आणि इकडे तिकडे न पाहता सरळ मुलीच्या दर्शनाला गेले. बाळंतिणीच्या खोलीत बराच अंधार होता. तात्यांनी हलकेच हाक मारली,

       ‘  जानकी ! ’’

       ‘ इश्श! काय हे? नावानं का हाक मारायचं?  ’’  जानकी  लाजून चूर झाली.

            ‘ आपलं बाळ? ’’

       ‘ इथे झोळीत झोपलंय. थेट स्वारीचं रूप घेतलं आहे. ’’

जानकी बोलत होती. ‘ पितृमुखी, सदासुखी.’’

     ‘ बापरे! पितृमुखी? मग कठीणच म्हणायचं.’’  घाबरल्याचा अभिनय करत तात्या म्हणाले.

     ‘ का? तुमच्या मुलीत तुमचं तेज येणारच. ’’ जानकीच्या स्वरात तात्यांबद्दलचा आदर जाणवत होता.

        ‘पहिली बेटी, धनाची पेटी. खूप काही घेऊन आली ही. आपण हिला मुलाप्रमाणे तलवार चालवायला शिकवू. दांडपट्टा फिरवायला शिकवू. घोड्यावर रपेट करायला शिकवू. ’’

        ‘ पुरे. तिनं ऐकलं तर आताच निघेल ती घोड्यावर बसायला. ’’  जानकी हसली. तात्याही हसले.

        ‘जानकी, ती मनू  बिठूर सोडून जाणार आहे. ती चालली आणि ही आली. माझी मनू.’’ तात्यांनी मुलीच्या गालावरून हळूवारपणे हात फिरवला. ‘मनकर्णिका,मनू. माझी मनू. ’’ तात्यांचं कन्याप्रेम पाहून जानकीचं ऊर भरून आलं. इतक्यात बाहेरून मातोश्रींची हाक आली,

        ‘ तात्या! सूनबाईंना विश्रांती घेऊ द्या.’’ तात्यांनी मुलीच्या गालावरून पुन्हा एकदा हात फिरवला. तात्या बाहेर आले, आणि तडक माडीवरच्या खोलीकडे गेले. मातोश्रींना त्यांचा आनंद  त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवला होता

     + + + + +

-इकडे देवळात कीर्तनकार आळेकर बुवा महाराज सांगत होते. बाराव्या दिवशी तात्या टोपेंच्या घरात बारशाचा सोहळा पार पडला. कन्येचं नाव मनकर्णिका ठेवलं गेलं. मोरोपंत तांब्यांची मनू लग्न होऊन झाशीची राणी होणार होती. नानासाहेब, तात्या, रावसाहेब तिला विसरू शकत नव्हते. कारण ते तिघेही एकाच वेळी घोड्यावर बसायला, तलवार चालवायला, भाला फेकायला शिकले होते. बालमित्रच म्हणाना! तसे तात्या, हे नानासाहेब आणि मनूपेक्षा जवळ जवळ दहा वर्षांनी मोठे, पण त्यांचं नातं मित्रत्वाचं. घट्ट. मनूची आठवण या लोकांना येणारच.

Comments

Popular posts from this blog

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका